
इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांनाही बसतोय फटका
MH 28 News Live : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वत्र वाढल्याचा परिणाम सामान्य माणूस आणि व्यापारी यांना भोगावे लागत असून शेतकरी देखील यातून वाजता नाहीये. शेतकऱ्यांना देखील या इंधन दरवाढीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे असून त्याचे दुष्परिणाम शेतकरी वर्गाला सुध्दा सहन करावे लागत आहेत.
यंदा रब्बी हंगाम महिन्याभराने लांबलेला आहे. एप्रिलअखेरर्यंत हंगाम संपलेला असेल. यानंतर मात्र शेती मशागतीची कामे सुरु होतात. हे दरवर्षीचे असले तरी यंदा वाढत्या उन्हाबरोबर महागाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. बैलजोडीने शेती मशागतीचे चित्र हे दुर्मिळ झाले असून याची जागा आता यांत्रिकिकरणाने घेतली आहे. शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्याने व्यवसाय सुलभ होणार आहे पण तो शेतकऱ्यांना परवडेना झाला आहे. ऐन शेती मशागतीची कामे सुरु होत असतानाच गेल्या 13 दिवसांमध्ये इंधन दरात वाढ होत आहे. त्यामुळे नांगरण, रोटर, सरी तोडणे यासाठीही शेतकऱ्यांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. एकंदरीत इंधन दरवाढीमुळे शेतीमालाच्या किंमती वाढल्या पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांना होत आहे. तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमालाचे उत्पादन हे बेभरवश्याचे झाले असले तरी शेतकऱ्यांना मशागतीसाठीचा खर्च अनिवार्य झाला आहे.
ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे असे वाढले दर
खरिपातील पेरण्या होण्यापूरर्वी शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करावी लागतात. यासाठी आता सर्रास ट्रॅक्टरचाच वापर होत आहे. गतवर्षी ट्रक्टरने नांगरट आणि जमिन रोटरण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 1 हजार 800 रुपये मोजावे लागले होते यंदा मात्र, 2 हजार 500 रुपये द्यावे लागत आहेत. याचबरोबर सरी सोडण्याासाठी 1 हजार रुपये आकारले जात होते आता यामध्ये 500 रुपयांची वाढ झाली आहे. डंपिंगची एक खेप टाकण्यासाठी 300 रुपये ऐवजी आता 500 रुपये आकारले जात आहेत. महागाईचा फटका थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे तर दुसरीकडे शेतीमालाच्या किंमती त्या तुलनेत वाढलेल्या नाहीत.
शेती मशागत गरजेची
खरीप आणि रब्बी हंगामातील उत्पादन घेतल्यानंतर एप्रिल ते जूनच्या दरम्यान शेती मशागतीची कामे केली जातात. यामुळे मशागतीने जमिनीचे थर खालीवर होतात. जमीन भुसभुशीत व रवाळ होते. तसेच पावसाचे पाणी वरून वाहून न जाता ते जास्त प्रमाणात जमिनीत मुरते आणि जमिनीत ओलावा साठून राहतो. मशागतीमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, खत चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळते आणि कीटकांना व कवकीय रोगांना आळा बसतो. यामुळे रब्बी हंगाम संपला की शेती मशागत करुन खरिपातील पेरणीसाठी शेत तयार ठेवले जाते.
कमी खर्चासाठी शेतकऱ्यांकडे पर्याय काय ?
शेती व्यवसयामध्ये यांत्रिकिकरणाचा वापर वाढत असून ही उत्पादनासाठी चांगली बाब आहे. पण नांगरणीपासून ते मशागतीपर्यंत शेतकरी यंत्राचाच वापर करीत आहे. यामुळे उत्पादनावर अधिकचा खर्च होऊन शेती परवडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना नांगरण, रोटर यासारखी कामे ट्रॅक्टरद्वारे तर पेरणी आणि पिकांच्या मशागतीच्या कामासाठी बैलजोडीचा वापर केला तरच खर्चावर अंकुश राहणार आहे. शिवाय दिवसेंदिवस ही महागाई वाढणार असून त्या तुलनेत उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.



