
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार – उध्दव ठाकरे
MH 28 News Live, चिखली : हे खोके सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून पनवती सुरू झाली आहे. जुलै महिन्यापासून आजपर्यंत राज्यात एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मी मुख्यमंत्री असतो तर ह्या आत्महत्या घडल्या नसत्या, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असून संकटकाळी आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी यापुढे आत्महत्या न करता संकटांना धैर्याने तोंड द्यावे असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज चिखली येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात प्रमुख भाषण करताना ते बोलत होते.

सुमारे चाळीस मिनिटे चाललेल्या आपल्या भाषणात उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसह राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले. पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या आमदार आणि खासदारांवर ठाकरे यांचा कडक शब्दात समाचार घेत भारतीय जनता पक्ष आणि राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर देखील टीका केली. उध्दव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी पक्षाचे नेते खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, चंदाताई बढे, लक्ष्मण वडले, प्रियंका जोशी, जिजाबाई राठोड, कल्याणी वाघमोडे यांची देखील भाषणे झाली. यावेळी मंचावर खा. विनायक राऊत, विधान परिषद उपाध्यक्षा आ. नीलम गोर्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, आ. नितीन देशमुख, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले उध्दव ठाकरे
शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यानंतर मुंबईबाहेर झालेल्या या पहिल्याच सभेत बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरांना प्रमुख लक्ष्य केले. मराठी मातीतील गद्दारी गाडण्यासाठी आपण जिजाऊंच्या जिल्ह्यात आलो असल्याचा उल्लेख आपल्या भाषणाच्या सुरुवातीला करून ठाकरे यांनी आज असलेल्या संविधान दिवस आणि मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची आठवण करून दिली. देशाचे संविधान आज सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांना स्वतः चे भविष्य माहिती नाही म्हणून ज्योतिषाकडे हात दाखवायला जातात, अशांच्या हाती महाराष्ट्राचे भवितव्य आहे, परंतु, यांचे भवितव्य मात्र दिल्लीत बसलेल्यांच्या हातात आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले. नवस फेडण्यासाठी मी गुवाहाटीला न जाता इथे शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो असल्याचे ते म्हणाले. मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच पक्षातीलच बंडखोरांनी आमचे सरकार पाडले त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचेच नुकसान झाले असा आरोप ठाकरे यांनी केला. पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत, शेतातील डीपी जळाल्याने कृषीपंप बंद पडले, कर्जमाफी होत नाही अशा अनेक गोष्टींमुळे सध्या शेतकरी संकटात सापडला आहे, या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांनी हुकूमशाही मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जागे व्हावे असे आवाहन आपल्या भाषणातून केले.
अब्दुल गट्टार… आणि ‘ गद्दार ‘
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा उल्लेख ‘ अब्दुल गट्टार ‘ असा करत उध्दव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरांवर शाब्दिक प्रहार केले. जिल्ह्यातील खासदार, दोन आमदार आणि एका माजी आमदारांची नावे न घेता त्यांना देखील ठाकरे यांनी ‘ गद्दार ‘ असे संबोधले. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सोडवण्यासाठी थेट पंतप्रधानांना राखी बांधून ‘ अभय ‘ मिळवणाऱ्या आमच्या ताई अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी खा. भावना गवळी यांच्यावर टीका केली तर आ. बच्चू कडू यांना आम्ही दिलेले मंत्रीपद मानवले नाही आणि त्यांनी बंडखोरांना साथ दिली मात्र आता तर मंत्रीपद सुध्दा गेले आणि ‘ पन्नास खोके ‘ असे टोमणे लोकांकडून ऐकावे लागतात अशी त्यांची अवस्था झाल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात पार पडलेल्या या सभेमध्ये बुलढाणा जिल्ह्यासह अकोला, वाशीम, जालना, संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते उध्दव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते.



