
कापसाला योग्य भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व मजूरांना करावा लागतोय आर्थिक अडचणींचा सामना
MH 28 News Live, बुलढाणा : यंदा कापसाचे पीकही चांगले झाले. मात्र, योग्य दर नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कापूस विक्रीला येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून यावर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.


हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने कपाशी जोमात होती. परंतु जुलै-ऑगस्ट या दोन्ही महिन्यांमध्ये पावसाने लपंडाव केल्याने पिकाचे नुकसान झाले. तर परतीच्या पावसाने बोंडे सडली. पाने पिवळी पडून नुकसान झाले होते. आलेल्या कापसाची शेतकऱ्यांनी वेचणी करून सध्या पीक साठवून ठेवले आहे.
जानेवारी संपला तरीदेखील अपेक्षित दरवाढ होत नसल्याने शेतकरी विक्रीच्या मानसिकतेत नाहीत. जिनिंग, प्रेसिंग उद्योगात हमाली करणाऱ्या मजुरांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कापसाचे भाव वाढत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवलेला आहे. कापसाची आवक अल्पशा प्रमाणात असल्याने खरेदी केंद्रावर तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. परिणामी काम मिळत नाही आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.



