
नियमबाह्य रस्ता बांधकामासाठी स्मशानभूमीतील थडगी उद्ध्वस्त; अनिल कांबळे यांच्या अमरावती येथील उपोषणाचा आज सहावा दिवस
MH 28 News Live / चिखली: येथील नगर परिषदेच्या (न.प.) अधिकाऱ्यांनी खासगी ले-आऊट धारकाच्या रस्त्याकरीता नियमबाह्यपणे शासकीय एफ-क्लास जमिनीतील मातंग समाजाच्या स्मशानभूमीतील दफन केलेले थडगे उद्ध्वस्त केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अनिल भगवान कांबळे यांनी संबंधितांवर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास येत्या १ मे २०२५ पासून आयुक्तालय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली असून या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
चिखली शहरातील भूमापन क्रमांक ६२ मधील ४.६५ हेक्टर जमीन हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी ३० डिसेंबर १९८० च्या आदेशान्वये देण्यात आली आहे. या स्मशानभूमीत सर्व समाजबांधव आपापल्या धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करतात. या स्मशानभूमीच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू असताना, परिसरातील काही शेतमालकांनी अतिक्रमण केले होते, ज्याची तक्रार दिली. ०९/०५/२००३ रोजी करण्यात आली होती. त्यामध्ये ,स्मशाभुमी रोडवरील नदीवर पुल बांधण्यात यावा, दहनशेड, बैठकशेड व पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात येऊन स्मशानभूमीची मोजणी करून हद्द निश्चित करून स्मशानभूमीला चारी बाजुंनी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करुण आमरण उपोषण देखील करण्यात आले होते. दरम्यान, स्मशानभूमीला लागून असलेल्या भूमापन क्रमांक ६८ च्या शेतमालकांनी प्लॉट विक्रीसाठी ले-आऊट तयार केला आहे. या ले-आऊटमध्ये जाण्यासाठी न.प. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे आणि न.प. अभियंता सुशिल इंगळे यांनी लेआउटधारकाशी संगनमत करून शासकीय एफ-क्लास जमिनीतून नियमबाह्यपणे रस्ता बांधला. विशेष म्हणजे, हा रस्ता बांधताना मातंग समाजाच्या दफन केलेल्या थडग्यांचे सपाटीकरण करून थडग्यांची विटंबना करण्यात आले, ज्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या गंभीर प्रकाराबाबत चिखली भाग १ च्या तलाठ्यांनी २६ जुलै २०२४ रोजी तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, थडगी उद्ध्वस्त करणाऱ्या संबंधितांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे. तसेच, आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या न.प. मुख्याधिकारी आणि अभियंत्यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी मंजूर निधी असताना आणि कार्यारंभ आदेश जारी होऊनही संरक्षण भिंतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. आता स्मशानभूमीच्या हद्दीतून खासगी ले-आऊटसाठी रस्ता बांधल्याने या जमिनीचा गैरवापर झाला आहे, असा आरोप अनिल कांबळे यांनी केला आहे.