
Breaking News डॉक्टर हरवले… संतोष भुतेकर बनले वैद्य ! शेळगावात अनोखे आंदोलन; आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड
MH 28 News Live / चिखली : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा रुग्णांची नाही, तर डॉक्टरांची गैरहजेरी नोंविण्यात व्यस्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील आयुष्यमान आरोग्य केंद्रातील गंभीर अनियमिततेकडे लक्ष वेधण्यासाठी इसरुळचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतेकर यांनी थेट डॉक्टरांची भूमिका साकारत एक आगळंवेगळं आंदोलन उभं केलं.
या दवाखान्याला तब्बल २४ गावे जोडलेली असून शासनाने येथे तीन एमबीबीएस डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली आहे. मात्र, प्रत्यक्षात हे कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर असून, रुग्णसेवा ही केवळ कागदोपत्रीच राहिलेली आहे. डॉक्टर नियमित अनुपस्थित, नर्सेसची निष्क्रियता, संपूर्ण परिसरातील अस्वच्छता, व शुद्ध पाण्याची गैरसोय हे येथे नित्याचे झाले आहे.
संतोष भुतेकर यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात येत स्वतः डॉक्टर म्हणून रुग्णांची तपासणी केली. त्यांच्या सोबत ओम गायकवाड यांनी कंपाउंडरची भूमिका निभावली तर भारत बोर्डे यांनी साफसफाई करून सफाई कर्मचाऱ्यांचे काम हाती घेतले. हे आंदोलन कोणत्याही राजकीय नेत्याच्या विरोधात नव्हे, तर निष्काळजी प्रशासनाच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य केंद्रात अस्वच्छतेची बजबजपुरी
या आरोग्य केंद्रातील जलशुद्धीकरण यंत्र अनेक दिवसांपासून न साफ केल्यामुळे त्यात आळ्या निर्माण झाल्या होत्या. बाथरूम्स आणि शौचालयांची अवस्था उकिरड्यापेक्षा वाईट झाली असून, हे दृश्य आरोग्य सेवेच्या बकाल व्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे.
सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर डॉक्टरांची उपलब्धता न मिळाल्याने ते चिखलीकडे वळण्यास बाध्य होतात, जे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खर्चिक आणि त्रासदायक ठरते. डॉक्टर आठ वाजता येण्याऐवजी दहा वाजेपर्यंतच दाखल होतात, ज्यामुळे शेतकरी आणि रोजंदारी करणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान होते.
भुतेकरांनी मागणी केली की, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी. केवळ एसी ऑफिसमध्ये बसून आढावे घेऊन समस्येचे निराकरण होत नाही, याचा ठळक संदेश त्यांनी आपल्या प्रतिकात्मक आंदोलनातून दिला.
ही घटना केवळ शेळगावपुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ व्यवस्थेचे प्रतीक बनली आहे. नागरिकांचे आरोग्य ज्या व्यवस्थेवर अवलंबून आहे, तीच जर अर्धवट झोपेत असेल, तर रोगांपेक्षा निष्क्रिय आरोग्य सेवा अधिक धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.