
सोयाबीनवरील अळीमुळे नुकसान; आ. श्वेताताई महाले यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना मदतीची केली मागणी
MH 28 News Live / चिखली : मतदारसंघात सोयाबीन पिकावर हुमणी अळीच्या झालेल्या मोठ्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आ. श्वेताताई महाले यांनी हा मुद्दा विधिमंडळात “पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन” अंतर्गत उपस्थित केला. त्यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. महाले यांनी केली आहे.

दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिखली मतदारसंघातील १२ गावांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे नमूद करत त्यांनी कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फवारणी, स्प्रिंकलर वापरूनही फारसा परिणाम होत नसल्याचे सांगितले. शासनाच्या सध्याच्या धोरणांत अळी व कीडीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाईची कोणतीही तरतूद नसल्यामुळे अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती.
आ. महाले यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत कृषिमंत्री यांनी त्यांना भेटीस बोलावले. त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर केला आणि लेखी निवेदन दिले. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी तातडीने बुलढाणा जिल्ह्याचे कृषी अधिकारी मनोज ढोके यांच्याशी संपर्क साधून बाधित भागात त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.
शासकीय यंत्रणा अनेकदा कुचकामी ठरते, असे चित्र असताना, एका आमदाराच्या तत्पर पाठपुराव्यामुळे सरकारचा यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, याचे उदाहरण म्हणून ही कारवाई जनतेमध्ये सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.



