
हरवणाऱ्या मुलींच्या शोधासाठी आता राज्य सरकारचे नवे पाऊल, ठाण्यास्थापना’ मिसिंग सेल ‘ ची स्थापना
MH 28 News Live : गेल्या काही काळात अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. या घटना केवळ संबंधित कुटुंबांपुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. एका अल्पवयीन मुलीचा अचानक बेपत्ता होणं हे त्या घरासाठी आभाळ कोसळल्यासारखं असतं. अशा प्रसंगी वेळेवर मदत आणि तत्पर शोधमोहीम अत्यंत आवश्यक ठरते.

दुर्दैवाने, अनेक प्रकरणांमध्ये तपास प्रक्रियेतील विलंबामुळे मुलींचा ठावठिकाणा लागत नाही, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोके वाढू शकतात. ही गंभीर बाब लक्षात घेता, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात आता स्वतंत्र ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. या सेलद्वारे बेपत्ता मुलींच्या प्रकरणांचा प्राथमिक टप्प्यावरच अधिक गांभीर्याने तपास केला जाईल आणि वेळ न दवडता शोधमोहीम राबवली जाईल. यामुळे अशा घटनांवरील नियंत्रण मिळविणे आणि पीडित कुटुंबीयांना दिलासा देणे शक्य होणार आहे.
हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत आश्वासक मानला जात आहे. राज्य शासनाच्या या पावलामुळे असंख्य पालकांच्या मनातील भीती काही अंशी का होईना, कमी होईल, अशी अपेक्षा आहे.



