
स्मशानभूमीला लाभले नवे रंगरूप; चिखलीत दुर्लक्षीत बौद्ध स्मशानभूमीचे नागरिकांनी केले सौंदर्यीकरण
MH 28 News Live / चिखली : नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्षतेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. शहरातील बौद्ध स्मशानभूमी अनेक वर्षे अडगळीत टाकल्यासारखी पडून होती. गवतांनी व्यापलेली, कचऱ्याने भरलेली आणि दुर्लक्षामुळे ओसाड झालेली ही जागा पाहून नागरिकांना चीड येत होती. “ही स्मशानभूमी नगरपरिषदेकडे आहे की विसरभोळ्या लोकांकडे ?” असा सवाल प्रत्येकाला पडत होता.

मृतांच्या स्मृतींचा सन्मान राखणे हे समाजाचे कर्तव्य असते, पण नगरपरिषद मात्र या कर्तव्यातही अपयशी ठरली. कर वसूल करण्यात नेहमी पुढे असलेली संस्था, स्वच्छतेच्या बाबतीत मागे का पडते? असा कटू प्रश्न उपस्थित होतो.
पण या सर्व दुर्लक्षावर उपाय म्हणून नागरिकच पुढे सरसावले. स्वखर्चातून निधी गोळा केला, श्रमदान केले आणि पाहता पाहता स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण केले. गवत उपटले, कचरा हटवला, रंगरंगोटी केली आणि परिसर स्वच्छ व सुशोभित केला.



