
आधार अपडेटचे दर वाढले, नागरिक हैराण
MH 28 News Live / बुलढाणा : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा ने (UIDAI) आधारकार्ड अपडेटसाठीचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाले असून ते ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू राहणार आहेत.

यापूर्वी आधारकार्डवरील नाव, पत्ता किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट बदलण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता या सेवेसाठी नागरिकांना ७५ रुपये मोजावे लागतील. तसेच बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्याचे शुल्कही १०० रुपयांवरून १२५ रुपये इतके वाढवण्यात आले आहे.
दरम्यान, नवीन आधारकार्ड काढणे मात्र पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहणार आहे. UIDAI ने स्पष्ट केले की, शुल्कवाढ केवळ आधारकार्डमधील माहितीमध्ये दुरुस्ती किंवा अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेसाठी आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “आम्हाला पत्ता बदलण्यासाठी किंवा आडनाव दुरुस्तीसाठी अनेकदा अपडेट करावे लागते. प्रत्येक वेळी वाढलेले शुल्क भरावे लागणे त्रासदायक आहे,” असे एका नागरिकाने सांगितले. ” सामान्य लोकांवर आर्थिक ओझे टाकण्याऐवजी शासनाने या सेवा अधिक सुलभ करायला हव्यात,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांकडून व्यक्त झाली.
तज्ज्ञांचे विश्लेषण
तज्ज्ञांच्या मते, UIDAI ने ही वाढ सेवा केंद्रांवरील खर्च, तांत्रिक सुधारणा व व्यवस्थापनातील वाढते खर्च लक्षात घेऊन केली आहे. तथापि, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही वाढ काहीशी जाचक ठरू शकते.
आधारकार्ड हे देशभरात सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. बँकिंग व्यवहार, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, शाळा-कॉलेज प्रवेश, पासपोर्ट, मोबाईल सिम कार्ड यांसह जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आधार आवश्यक असल्याने या शुल्कवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार आहे.



