
भानखेड येथे तापेची साथ दोन मुले दगावली; डेंग्यूची साथ बळावली गावात भितीचे वातावरण
MH 28 News Live, चिखली : येथून जवळच असलेल्या भानखेड या २ हजार लोकसंख्येच्या गावामधे तीन आठवड्यापासून ताप आल्याने चिखली येथील वेगवेगळ्या रुग्णालयात २५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर रुग्ण ७० बरे होऊन घरी गेले तर ऋतूराज इंगळे वय १० महिने ओम वाघ वय १४ वर्ष यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील भानखेड येथील नागरिकांची अर्थिक परिस्थिती बेताची असुन त्यातच अचानक तापेची साथ सुरू झाल्याने रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी देखील या नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. या आजाराच्या सुरवातीला प्रचंड ताप येतो आणि डोकेदुखीचा त्रास देखील मोठ्या प्रमाणावर होतो. त्यानंतर अन्नपाणी जात नसल्याने रुग्णांना रुग्णालयात भरती केल्या नंतर रक्त तपासणी केल्या नंतर यामध्ये डेंग्यू सदृश्य अहवाल येतो आणि पेशी कमी होतात. या परीस्थितीत रुग्णांना तात्काळ रुग्णालयात भरती व्हावे लागते. असेच लक्षण असलेले जवळपास २५ रुग्ण स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असुन अनेकांना पैशाअभावी पुरेशे उपचार मिळत नसल्याचे विदारक चित्र दिसून येते आहे. मागील तीन आठवड्यापासून हा साथीचा आजार बळावला असुन यामुळे गावामध्ये देखील घर परत रुग्ण आढळत आहेत. या साथीमुळे आरोग्य विभाग भानखेड येथे जात आहे परंतु नेमकी ही साथ का बळावली हे मात्र समोर आल नाही. त्यामुळे गावात ही साथ कशामुळे सुरू झाली हे तपासून वाढत चालेली ही साथ आटोक्यात आणने गरजचे झाले आहे.
तापेची साथ आणखी फैलू नये यासाठी सरपंच, पोलीस पाटील हे गावातील स्वच्छतेची काळजी घेत असुन फवारणी करत आहेत . जि.प.सदस्य डॉ. ज्योती खेडेकर यांनी याठिकाणी भेट दिली तसेच आरोग्य सेवक देखील तपासणीसाठी फिरत असले तरी साथ आटोक्यात येत नाही त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
उपचाराअभावी गरीबांचे हाल
अर्थिक परिस्थिती बेताची असुन पेरणीचे दिवस डोक्यावर आले असतांना तापेची साथ सुरू झाली. घरातील सदस्यांवर उपचार करुन घेण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होणारे कुटुंब प्रमुख मात्र हताश झाले आहेत. रुग्णालयात गेलेल्या एका रुग्णाला तब्बल २५ ते ३० हजार रुपये खर्च करावा लागत आहे. सुट्टी झाल्यावर देखील काही दिवस हलगर्जीपणा झाला तर परत तब्येत बिघडण्याची शक्यता डॉक्टर वर्तवत आहेत.
डासांमुळेच साथीची लागण
एवढ्या मोठ्या प्रमाणावर साथ सुरु झाली असुन याबाबत रुग्णांना वर उपचार करणारे डॉक्टर शिवशंकर खेडेकर यांना नेमक आजाराचे कारण विचारले असता डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने हा आजार होऊ शकत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे भानखेड येथील रुग्ण उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.



