
शिक्षकांच्या खांद्यावर भरतीची जबाबदारी… पटसंख्या वाढवण्यासाठी शाळांनी लावले ‘ गुरुजी ‘ कामाला
MH 28 News Live / देऊळगाव राजा : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मूलभूत सुविधा जसे की स्वच्छतागृहे, इमारतींचा विकास, शाळेत डिजिटल साधनांचा वापर अशा अनेक सुधारणा केल्या जात असतानाही, शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या मात्र सातत्याने घटताना दिसत आहे. ही बाब शासनासाठी तसेच शिक्षकांसाठीही मोठी चिंतेची ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर, २३ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये “भरती मोहीम” राबवण्यात येत आहे. अनेक शिक्षकांनी घराघरात जाऊन पालकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. गावोगावी फिरून मुलांच्या शैक्षणिक गरजा, त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जात आहे.
विशेषतः पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या बालकांसह, शिक्षण अर्धवट सोडलेली मुलेमुली पुन्हा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे. याला काही प्रमाणात पालकांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे काही ठिकाणी पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फक्त जिल्हा परिषद किंवा नगरपालिका शाळाच नव्हे, तर खाजगी शाळांचे व्यवस्थापनही विद्यार्थ्यांच्या भरतीसाठी सक्रीय झाले आहे. त्यांच्या शिक्षकांनाही यासाठी कामाला लावण्यात आले असून, भरतीसाठी विविध आकर्षक योजना, सवलती आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
ही स्पर्धा शिक्षणाच्या क्षेत्रात जिवंतपणा आणणारी असली तरी त्यामागची वस्तुस्थिती — म्हणजे ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडे असलेले दुर्लक्ष, लोकांचा खाजगी शिक्षणाकडे वाढता कल — हे प्रश्नदेखील नव्याने समोर आणणारी आहे. सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि शिक्षकांचे प्रयत्न हे यशस्वी ठरतील का, हे येणारा काळच ठरवेल.