
पीएम किसान सम्मान योजनेचा अकरावा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
MH 28 News Live : देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान या योजनेअंतर्गत किसान सम्मान निधी दिला जातो. शेतकऱ्यांसाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येत असून केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधीच्या संबंधित शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता थेट खात्यात जमा करत असते. त्याच्या 11 व्या हप्त्याचे पैसे अजून जमा झाले नाही. केंद्र सरकार येत्या 31 मे रोजी PM-KISAN चा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. तब्बल 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मध्यप्रदेशमध्ये एका कृषी कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सम्मान निधीची घोषणा केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी दिला जातो. या निधीचा 11 वा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC ची गरज
तुम्ही जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला पीएम किसान खात्याची ईकेवायसी करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ईकेवायसी केली तर तुम्हाला त्यासाठी पैसै द्यावे लागणार आहेत. तसेच तुम्ही मोबाईवर किंवा लॅपटॉपवरही ईकेवायसी करू शकता.