
सहकार्य गणेश मंडळाचा पर्यावरणपूरक बाप्पा; शाडूमाती अन् गव्हाच्या ओंब्यांतून साकारली गणेश मूर्ती , ‘अन्न हे पूर्णब्रह्म’चा सामाजिक संदेश
MH 28 News Live / चिखली : गणरायाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असताना चिखलीतील सहकार्य गणेश मंडळाने गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत आपली आगळीवेगळी परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गेल्या १२ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करणाऱ्या मंडळाने यंदा शाडूमाती तसेच गव्हाच्या ओंब्यांचा वापर करून गणेशमूर्ती साकारली आहे. धार्मिक उत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा मंडळाचा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती, थर्माकॉल आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध कृत्रिम साहित्यामुळे विसर्जनानंतर जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. उत्सवाचा आनंद साजरा करताना निसर्गाची हानी होऊ नये, यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते. हीच बाब लक्षात घेऊन सहकार्य गणेश मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेची परंपरा सुरू केली असून, गेल्या १२ वर्षांपासून ती सातत्याने जपली जात आहे. त्यामुळे मंडळाचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय न राहता पर्यावरण जागृतीचे माध्यम ठरत आहे.
गव्हाच्या ओंब्यांतून शेतीचा सन्मान; ‘अन्न हे पूर्णब्रह्म’चा जागर
यंदाच्या गणेशोत्सवातील देखाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे त्यातून मांडण्यात आलेला अन्न आणि शेतीचा संदेश. गव्हाच्या ओंब्यांचा कल्पक वापर करून शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आपल्या ताटातील प्रत्येक घासामागे शेतकऱ्याचे अथक श्रम, निसर्गाची साथ आणि शेतीशी निगडित मोठी प्रक्रिया असते, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे.
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या भावनेतून अन्नाची नासाडी टाळण्याचे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्न वाया घालवू नका, शेतीकडे केवळ उत्पादनाचे साधन म्हणून न पाहता जीवनाचा आधार म्हणून पाहा, असा संदेश या देखाव्यातून प्रभावीपणे देण्यात आला आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा देखावा नागरिकांसाठी जागृतीचा विषय ठरत आहे.
भक्तीबरोबर सामाजिक बांधिलकी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सहकार्य गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकीची परंपराही कायम ठेवली आहे. २१ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही समाजोपयोगी कार्याला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रक्तदानातून जीवनदान, आरोग्य शिबिरातून आरोग्यजागृती आणि बालस्पर्धांमधून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा उपक्रम यामागे आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि सामाजिक आशय असलेला देखावा पाहण्यासाठी शहरातील नागरिक, आबालवृद्ध आणि लहान मुलांची गर्दी होत असून मंडळाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, सहकार्य गणेश मंडळाच्या पर्यावरणपूरक उपक्रमातून प्रेरणा घेत इतर गणेश मंडळांकडूनही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्सवाचा उत्साह कायम ठेवत पर्यावरणाची काळजी, अन्नाची कदर आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा सहकार्य गणेश मंडळाचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवात वेगळा ठरत आहे.
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष संदीप लोखंडे तसेच जयंत चव्हाण, निलेश भुसारी, श्रीकांत सोळंकी, सुचित भराड, नितीन जांगीड, आशिष गोलानी, संजय कदम, चेतन नागवानी, दत्ता खंडेलवाल, ओम वसु, हर्षल अग्रवाल, वचन वायकोस, निखिल खरपास, अभिषेक काकडे, पवन देशमुख, कृष्णा नागरे, कुणाल म्हस्के आणि कुणाल चव्हाण यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.



