♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

२४९५ श्वानांचे निर्बीजीकरण झाले, मग हा कोंडवाडा कशासाठी ? बंद हॉलमध्ये कुत्र्यांना डांबले; कुजलेल्या मृतदेहाने चिखली पालिकेच्या कारभाराची पोलखोल

MH 28 News Live / चिखली : भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाच्या कामात २,४९५ श्वान पकडल्याचा दावा, मात्र त्यापैकी केवळ ४९३ श्वानांचे जीपीएस पुरावे सादर केल्याच्या आरोपामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चिखली नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर आणखी एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच वर्षीय आयांशवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर शहरातील श्वान पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, पकडलेल्या कुत्र्यांना मुकुल वासनिक भवनातील एका बंद हॉलमध्ये कोंडून ठेवल्याचे समोर आले असून, याच ठिकाणी एका श्वानाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते राहुल वरवंडे यांनी हा प्रकार समोर आणला आहे. आपल्या पाळीव कुत्र्यांच्या शोधात गेलेल्या काही नागरिकांनी हॉलमधील परिस्थितीचे फोटो काढले. या छायाचित्रांमध्ये जमिनीवर मोठ्या प्रमाणात विष्ठा, उष्टे अन्न, अस्वच्छता आणि एका कोपऱ्यात किडे पडलेल्या अवस्थेतील कुजलेला श्वानाचा मृतदेह दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या हॉलला लागूनच चिखलीचे उपजिल्हा शासकीय रुग्णालय असल्याने या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

नियमांचे पालन झाले का ?

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पकडणे, निर्बीजीकरण करणे, लसीकरण करणे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सोडणे, अशी नियमनाधारित प्रक्रिया अपेक्षित आहे. त्यासाठी अधिकृत सुविधा, पशुवैद्यकीय देखरेख आणि आवश्यक आरोग्यविषयक व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या बंद हॉलमध्ये मोठ्या संख्येने कुत्र्यांना ठेवण्यात आले असेल, तर ही व्यवस्था कोणत्या अधिकृत आदेशानुसार करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच, बंदिस्त आणि अस्वच्छ वातावरणात प्राणी ठेवणे, त्यांना आवश्यक अन्न-पाणी किंवा वैद्यकीय देखरेख न मिळणे आणि मृत प्राण्याची वेळेवर विल्हेवाट न लावणे, याबाबत प्राणी कल्याणाच्या नियमांचे पालन झाले का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मृतदेहामुळे दुर्गंधी तसेच संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाच्या लगतची परिस्थिती अधिक गंभीर मानली जात आहे.

२४९५ श्वानांचा दावा पुन्हा चर्चेत

काही दिवसांपूर्वी सचिन राठी यांनी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ४६.६६ लाख रुपयांच्या श्वान निर्बीजीकरण योजनेत २,४९५ श्वानांचे काम कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पाच वर्षीय आयांशवर झालेल्या हल्ल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. आता कुत्र्यांना एका बंद हॉलमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याचा आणि तेथे मृत श्वानाचा मृतदेह आढळल्याचा प्रकार समोर आल्याने नगरपरिषदेच्या संपूर्ण श्वान नियंत्रण मोहिमेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

“नगरपरिषदेने कागदावर २,४९५ श्वानांचे निर्बीजीकरण दाखवले, मात्र प्रत्यक्षात शहरात कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसतात. लहान मुलावर हल्ला झाल्यानंतर कुत्र्यांना पकडून अशा पद्धतीने कोंडणे ही क्रूरता आहे. यात पाळीव कुत्र्यांनाही पकडण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल वरवंडे यांनी केली.

नगरपरिषदेसमोर प्रश्नांची सरबत्ती
या प्रकाराबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुकुल वासनिक भवन अधिकृत श्वान निवारा केंद्र म्हणून घोषित आहे का ? तेथे कुत्रे ठेवण्याचा लेखी आदेश कोणी दिला? पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे का? मृत श्वानाचा पंचनामा करण्यात आला का? त्याच्या विल्हेवाटीची नोंद कुठे आहे? तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारी अशा प्रकारे श्वान ठेवण्यास परवानगी कोणी दिली ? हे प्रश्न आता नगरपरिषद प्रशासनाला उत्तरावे लागणार आहेत.

दरम्यान, कुत्र्यांना तातडीने नियमांनुसार योग्य ठिकाणी हलवावे, मृत श्वानाच्या मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी आणि संबंधित परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन श्वान निर्बीजीकरण आणि नियंत्रण मोहिमेतील प्रत्यक्ष कामकाज व कागदोपत्री नोंदी यांची पडताळणी करण्याची मागणीही जोर धरत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129