
जिल्ह्यात सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात घट; वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईची शक्यता
MH 28 News Live, बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, सध्या उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. याचा परिणाम धरण आणि तलावातील पाणीसाठ्यावर होत आहे. झपाट्याने पाण्याची पातळी कमी होत असल्याचं चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाचा कडाका वाढल्याने धरणांमधील जलसाठ्यात घट होत आहे. सध्या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ५२.८६ टक्के एवढा जलसाठा आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि सात मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट झाली आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. परतीचा पाऊसही चांगला झाला होता. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये तलावांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता. मात्र, सध्या राज्यात तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा कडाका जाणू लागल्याने त्याचा पाण्याच्या पातळीवर होत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच झपाट्याने पाणीसाठी कमी होत आहे.

मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा घटला
बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पत गेल्या महिन्यात ५६.५९ टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर आता ४५.७९ टक्के जलसाठा आहे. यावरुन पाण्याची पातळी किती झपाट्याने कमी होते ते दिसत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही मोठ्या तीन आणि मध्यम सात प्रकल्पात दिसून येत आहे. 37 लघु प्रकल्पातील पाणी पातळीतही मोठी घट होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे आणि उन्हाच्या कडाक्यामुळे ही घट होत असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीलाच वाढत्या तापमानामुळे जर अशी घट होत असेल, तर उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान ३८ आणि ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर दुसीरकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही १५ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी अवस्था विदर्भासह राज्यातील काही भागात दिसून येत आहे. येणारा उन्हाळा विदर्भवासियांसाठी नेहमीपेक्षा जास्त कठीण असेल याची चाहूल आताच लागायला लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.



