
शेगावात भाविकांना पुन्हा लुटता येणार आध्यात्मिक पर्यटनाचा आनंद… ‘आनंद सागर’ झाले पर्यटकांसाठी खुले !
MH 28 News Live, शेगाव : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेले ‘आनंद सागर’ हे धार्मिक केंद्र पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

पुढील काळात टप्प्याटप्प्याने भाविकांसाठी इतरही सोयी सुविधा सुरू होणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. गेल्या काही काळात बंद पडलेले आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत निःशुल्क सुरू करण्यात आले आहे.
आनंद सागर येथील शांतता स्वच्छता सर्वश्रुत आहे. त्यामुळे येत्या काळात टप्प्याटप्प्याने आनंद सागर सुरू झाल्यानंतर शेगावात पर्यटक आणि अध्यात्मिक अनुभूती घेणाऱ्यांची गर्दी वाढणार आहे.
सदर परिसर हा पूर्वी शेगाव शहरालगतचा पडीक जमिनीचा भाग होता. २००१ मध्ये तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून जमीन लिझवर घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ‘आनंद सागर’ या केंद्राची तब्बल ३५० एकरवर उभारणी करण्यात आली होती. अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढले होते. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता येथील अध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू झाले आहे. हे अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुले करण्यात येत आहे. यातील प्रसिद्ध अशी मिनी ट्रेन, चिल्ड्रन पार्क, अम्युजमेंट पार्क हे सर्व काढून टाकण्यात आलेले आहे. फक्त त्यातील मंदिरं आणि इतर सुविधा यांचाच लाभ आता भक्तांना मिळणार आहे. त्यामुळे पूर्वीचे आणि आता नव्याने सुरू झालेले आनंद सागर यात मोठा फरक असणार आहे.



