चिखलीत विनापरवाना बांधकामाचा सळसुळाट; मुख्याधिकारी कारवाई का करेनात ?
MH 28 News Live, चिखली : नियम आणि कायदे कसलेही असोत; धनशक्तीच्या जोरावर मनमानी करणाऱ्या धनदांडग्यांची चिखलीमध्ये सध्या भलतीच चलती आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या जोरावर कायदा धाब्यावर बसवणाऱ्या या काही निवडक लोकांवर नगरपालिकेचे देखील नियंत्रण उरले नसल्याचे चित्र येथे पहायला मिळते. याला कारण म्हणजे चिखली नगरपालिकेच्या अंतर्गत बोकाळलेली बिना परवाना बांधकाम हे होय. शहरातील जुने गाव असो किंवा नवीन वस्ती असो या सर्व ठिकाणी विनापरवाना बांधकामे मोठ्या संख्येने होत असून यामध्ये बऱ्याच लोकांनी साधा नगरपालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज देखील केलेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, या बिनापरवाना बांधकामांवर चिखली नगरपालिका कारवाई का करत नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वेगाने शहरीकरण होणाऱ्या चिखली नगरात सध्या अनेक ठिकाणी नवीन बांधकामे सुरू असल्याचे आढळून येते. यामध्ये बऱ्याच प्रमाणात घरे व बंगल्यांची निवासी बांधकामे आणि काही ठिकाणी दुकाने, व्यापार संकुल आणि आँफीसेस अशी वाणिज्यिक बांधकामे होत आहेत. यापैकी काही संशयास्पद बांधकामांच्या संदर्भात चौकशी केली असता या बांधकामांचा रीतसर परवाना नगरपालिकेकडून काढला नसल्याची माहिती उजेडात आली आहे. माहितीच्या कायद्यांतर्गत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला नगर पालिकेकडून सदर बांधकामांच्या परवानगीसाठी आपल्याकडे अर्ज करण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण अर्जदाराला मिळाले. त्यामुळे ही बांधकामे नेमकी कोणाच्या परवानगीने चालू आहेत याबद्दल साहजिकच प्रश्न उपस्थित होतो.
अशी आहेत मग्रुरांची उत्तरे
चिखली शहरामध्ये सुरू असलेल्या या बिना परवाना बांधकामाबाबत काही बांधकामकर्त्यांशी चर्चा केली असताना त्यांनी आपण नगर पालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज सादर केला असे सांगितले ( मात्र ही माहिती खोटी निघाली ) तर काही मात्र एवढे निर्ढावलेले निघालेत की, त्यांनी चक्क आमच्या बांधकामासाठी आम्ही मंत्रालयातून विशेष परवानगी घेतल्याची थाप मारून समोरच्याला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे चिखली नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि अभियंते हे याबाबत अनाभिज्ञता दाखवत असले तरी ते देखील अशा विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्यामध्ये कचरतात हे सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही.
” गोरगरिबाला छोटेसे घरटे बांधायचे असले तर त्याला सर्व प्रकारच्या परवानग्या घेणे अनिवार्य असते मात्र, धनदांड्यांनी मजल्यावर मजले चढवले तरी त्यांना कोणीही विचारत नाही असे का ? तुमचे काही साटेलोटे आहे का ? ” असा अहवाल सर्वसामान्य चिखलीकर नगर पालिका प्रशासनाला विचारत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button