♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खा. ओमराजे निंबाळकर म्हणतात… धाराशिवच नव्हे, बुलढाणा – अकोल्यातील नागरिकही कामासाठी मला फोन करतात

MH 28 News Live : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. “आता मला फक्त धाराशिवमधूनच नव्हे, तर बुलढाणा, अकोला, अमरावतीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून नागरिक कामांसाठी फोन करतात,” असा दावा त्यांनी केला आहे.

लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघाचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना निंबाळकर यांनी हा उल्लेख केला. हा कार्यक्रम भाजपचे कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव गुंड यांच्या रूपामाता परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता.

आपला अनुभव सांगताना निंबाळकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातील एका नागरिकाचा त्यांना सोलार पंपाच्या कामाबाबत फोन आला होता. त्यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तीला प्रथम आपल्या स्थानिक आमदार आणि खासदारांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. “जर त्यांनी तुमचे काम केले नाही, तर मग मी स्वतः तुमचे काम करून देतो,” असेही त्यांनी सांगितल्याचे उपस्थितांना सांगितले.

या विधानामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. इतर जिल्ह्यांतील नागरिक थेट धाराशिवच्या खासदारांशी संपर्क साधत असल्याचा दावा कितपत वास्तव आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

यापूर्वीही ओमराजे निंबाळकर एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आले होते. त्या संभाषणात एका नागरिकाने वीज डीपीच्या कामाबाबत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी विकासकामांसाठी निधी आणि प्रशासकीय अडचणींमुळे सर्वसामान्यांची कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

दरम्यान, या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यशैलीची आणि राज्यभर वाढत असलेल्या त्यांच्या संपर्काची चर्चा रंगू लागली असून, येत्या काही दिवसांत या दाव्यावर राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129