
कृषी विभाग म्हणतो; शेतकऱ्यांनो डीएपीचा आग्रह सोडून संयुक्त खते वापरा
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ सुरु होत असुन शेतकऱ्यांचे रासायनिक खते व बियाणे खरेदीचे लगबग सुरु झाली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डी.ए.पी खताच्या वापराकडे दिसुन येतो. त्यामुळे बाजारात डी.ए.पी ची मागणी वाढलेली दिसते. परंतु उपलब्ध संयुक्त खतातुन सुद्धा पिकाच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डी.ए.पी खताचा आग्रह न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रा द्यावी जेणे करून डी.ए.पी खताऐवजी इतर संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते आणि शिफारशीप्रमाणे मात्रा सुद्धा देता येते.
या बाबत प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर संयुक्त खताचा चार्ट दर्शनीय भागात लावण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी खरीप हंगामात पिकांसाठी डी.ए.पी ऐवजी सयुंक्त इतर खताचा वापर करावा. कृषी सेवा केंद्र व निविष्ठा बाबत काही तक्रार असल्यास ,कृषी सेवा केंद्रावर संबंधित कृषी सहाय्यक याची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच थेट तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती किवा कृषी विभाग क्रमांक ९७६७३९९३३२ वर संपर्क साधावा, असेआवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.



