
निर्जन मंदिरांवर चोरट्यांचा डोळा: पलसोडा येथील मारोती मंदिरातून १.४५ किलो चांदीची चोरी
MH 28 News Live / संग्रामपूर : तालुक्यातील पलसोडा (महासिद्ध) गावातील प्राचीन मारोती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील हनुमान मूर्तीवरील सुमारे १ किलो ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या चोरीबाबत संस्थानचे अध्यक्ष शंकर ढोकणे यांनी सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख १ हजार रुपये इतकी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३५० ग्रॅमचा हार, ३०० ग्रॅमचा कंबरपट्टा, तसेच सुमारे ८०० ग्रॅमचे गदा व हात-पायातील कडे असा चांदीचा ऐवज लंपास केला. घटनेनंतर बुलडाणा येथून श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र ठोस माग काढण्यात अपयश आले. ठसेतज्ज्ञांनी ठसे गोळा केले असून, मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक लांडे, तसेच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले आहे.
सध्या पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयितांची माहिती संकलित केली जात आहे. विशेष म्हणजे, याआधी १४ जानेवारी २०२५ रोजीही सातपुड्याच्या कुशीत असलेल्या एका प्रसिद्ध हनुमान मंदिरात अशाच प्रकारे ५.४५ किलो चांदीची चोरी झाली होती. त्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण आहे. या दोन घटनांमधून चोरट्यांनी निर्जन भागात असलेल्या मंदिरांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट होते. हनुमान मंदिरांत भाविकांकडून चांदीचे दागिने अर्पण केले जात असल्यामुळे, अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेअभावी चोरट्यांना मुक्तसंचाराची संधी मिळत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button