
अमित शहांना भेटून आ. सौ. श्वेताताई महालेंनी दिले धन्यवाद आणि केल्या ह्या मागण्या
MH 28 News Live, चिखली : कठोर प्रशासक म्हणून देशभरात परिचित असलेले केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची आ. श्वेताताई महाले यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी चिखली मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रमुख मागण्या अमित शहा यांच्या समोर मांडल्या. शहा यांनी देखील या मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन आ. श्वेताताई महाले यांना दिले.
भारत सरकारने पहिल्यांदाच सहकार खाते सुरू केले. मा. अमितभाई शहा हे भारताचे पहिले सहकारमंत्री झाले. महाराष्ट्र राज्य सहकाराला दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राने सहकारातून चांगलीच प्रगती साधली. सहकारात महिलांना खूप कमी संधी आतापर्यंत उपलब्ध झाली. वस्तुतः महिलांना कुटुंब संस्था चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे महिलांना सहकारात अधिकाधिक वाव दिल्यास सहकार क्षेत्र अधिक मजबूत होईल असा आशावाद व्यक्त करून महिलांना सहकारात जास्तीत जास्त संधी देण्याची मागणी या वेळी केली.
तसेच चिखली तालुक्यातील ‘उंद्री’ गावाचे ‘उदयनगर’ असे नामकरण करण्याचा आ. सौ. श्वेताताई महाले यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडून सादर करण्यात आलेला आहे. त्या प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी केली.
डोंगर शेवली येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग पाटील यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या धर्मपत्नीस स्वातंत्र्य सैनिकांचे पेंशन तातडीने सुरू करण्याची व नाबार्ड अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी निधीची मागणीही आ. सौ. श्वेताताई महाले यांनी केली.
काय म्हणाल्या श्वेताताई ?
” ज्यांच्या कुशल नीतीमुळे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे व देशाच्या अखंडतेस बाधक ठरलेले कलम ३७० रद्द झाले ते आधुनिक भारताचे चाणक्य गृहमंत्री मा. अमितजी शहा यांची झालेली भेट हा आयुष्यातील कधीही न विसरता येणारा क्षण मर्मबंधातली ठेव होऊन गेला ” अशा भावना आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केल्या.
आणि व्यक्त केली ही अपेक्षा
अमित शहा यांच्याशी झालेल्या पहिल्याच थेट भेटीत आ. श्वेताताई महाले यांनी काश्मीरमधील घातक ठरलेले ३७० कलम हटवल्याबद्दल शहा यांचे अभिनंदन केले. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशाची एकता व सार्वभौमता अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी आ. महाले यांनी व्यक्त केला. सहकार विभागात अनेक सुधारणा व मूलभूत बदल करत असल्याबद्दल श्वेताताई महाले यांनी केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांना धन्यवाद दिले. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या भ्रष्ट राजकीय नेत्यांवरचँया कारवायांच्यासाठी देखील आ. श्वेताताई महाले यांनी शहा यांचे आभार मानले व केंद्र सरकारकडून अशीच कठोर कारवाई यापुढे देखील अधिकाधिक भ्रष्ट राजकारण्यावर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.



