
शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशकडे जाणारा मार्ग रोखला, वरवट बकाल येथे ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम
MH 28 News Live, संग्रामपूर : सोयाबीन-कपाशीची दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीतर्फे आज पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला संग्रामपूर तालुक्यात उत्साही प्रतिसाद मिळाला.
विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशकडे जाणारा अकोला-बऱ्हाणपूर महामार्ग रोखून धरला. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या. शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी कापूस-कांदे रस्त्यावर फेकून महामार्ग अडवला. शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, गाड्यांच्या लांब रांगा लागल्या असल्याने पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे यावेळी दिसून आले.
कापूस-सोयाबीनला भाववाढ, बोंडअळीमुक्त कपाशी बियाणे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ, रखडलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, विमा कंपनीने रोखलेला पीक-विमा, कृषी पंपाला दिवसाला वीज व कृषी कनेक्शनवर वाढलेल्या भार समतोलासाठी नवीन रोहित्र वाढवणे, उसाला एकरकमी एफआरपी, प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम, नाफेडमार्फत शासकीय कांदा खरेदी, ‘लंपी स्किन’ ने मृत्यू पावलेल्या पशुमालकांना भरपाई व बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.