
हरवलेल्या म्हशीच्या शोधात गेलेल्या शेतकऱ्याचा धरणात बुडून मृत्यू
MH 28 News Live / खामगाव : तालुक्यातील गेरू माटरगाव येथील शेतकरी सुभाष साबळे (वय अंदाजे ५०) यांचा ३१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास ज्ञानगंगा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, हिवरखेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुभाष साबळे हे आपल्या शेतात जात असताना त्यांची म्हैस हरवल्याचे लक्षात आले. म्हैस शोधण्यासाठी ते ज्ञानगंगा धरण परिसरात गेले. तेथील मच्छीमारांना त्यांनी सांगितले की, पलीकडच्या काठावर त्यांना म्हैस दिसली आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी थर्माकॉलच्या साहाय्याने पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला.

आरंभी सर्व काही आटोपशीर वाटत असले तरी धरणात काही अंतर गेल्यानंतर साबळे यांनी थर्माकॉल दूर फेकले. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते खोल पाण्यात बुडाले. काही वेळातच ते पाण्यात अदृश्य झाले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला. हिवरखेड पोलिस पुढील तपास करत आहेत.



