
गुरांचा गोठा कागदावरच; प्रत्यक्षात ठणठणाट ! ₹६२,२५० निधी वाटपावर संशय
MH 28 News Live / चिखली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गुरांचा गोठा बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी गुरांच्या गोठ्याचे बांधकाम अस्तित्वात नसतानाही ₹६२ हजार २५० रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचा आरोप तक्रार अर्जातून करण्यात आला आहे.
उत्रादा येथील लाभार्थी सौ. प्रिया श्रीकिसन इंगळे यांना सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरांचा गोठा हा लाभ मंजूर झाला होता. तक्रारदार रामेश्वर मनोहर इंगळे यांनी पंचायत समिती चिखलीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित लाभार्थ्याने अंदाजे १० बाय १२ साईजचा ओटा बांधलेला असून त्याव्यतिरिक्त कोणतेही काम केलेले नाही.
तक्रारीनुसार, गुरांच्या गोठ्याचे आवश्यक बांधकाम प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही कुशल निधीमधून ₹६२,२५० रुपये लाभार्थ्यास वितरित करण्यात आले. त्यामुळे शासकीय निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करण्यात यावी. दोष आढळल्यास संबंधित लाभार्थ्याकडून रक्कम वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करावी तसेच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
दरम्यान, गुरांचा गोठा मंजूर असताना प्रत्यक्षात गोठ्याचे बांधकाम झाले आहे का, तसेच ₹६२,२५० रुपयांचा निधी कोणत्या आधारावर वितरित करण्यात आला, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.b



