
मनसेशी युती नको ! कॉंग्रेसच्या भूमिकेने महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत
MH 28 News Live / बुलढाणा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत नवे वारे वाहताना दिसत आहेत. काँग्रेसने मनसेसोबतच नव्हे तर शिवसेनेसहही पुढे जाण्याबाबत सावध भूमिका घेतल्याचे संकेत मिळाले असून, या हालचालींमुळे आघाडीत अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी नुकतेच विधान केले की, “राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस जाणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रोखठोक भाष्य करत, “शिवसेना – मनसेसोबत जाण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यांनी आपली भावना व्यक्त केली असून या विषयावर नेतृत्व पातळीवर चर्चा होईल,” असे स्पष्ट केले.

त्यांच्या या विधानाने आघाडीच्या भविष्यासंबंधी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. काँग्रेसच्या गोटात “स्वतःची ओळख टिकवावी” अशी भूमिका बळावताना दिसत असून, मनसेसोबत युतीचा कोणताही विचार न करण्याचा सूर आता ठळकपणे उमटतोय. राजकीय वर्तुळात असा कयास बांधला जात आहे की, आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढतीचा विचार करू शकते, तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या भूमिकांवरही लक्ष केंद्रीत झाले आहे. महाविकास आघाडीत सुरू असलेला हा “संवादाचा संघर्ष” आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवू शकतो, अशी चर्चाही रंगत आहे.



