
अग्नीवीर अक्षयच्या रक्षाविसर्जन प्रसंगी काँग्रेस करणार राजकीय सारवासारव ? खा. राहुल गांधींचा दूत उपस्थित राहणार ?
चिखली : अग्नीवीर जवान अक्षय गवतेच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया साइटवरून केलेल्या पोस्टवरुन बरेच वादंग माजले होते. या पोस्टमध्ये त्यांनी अग्नीवीर अक्षयच्या कुटुंबाला कसलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचा आरोप केला होता. या आरोपाला प्रस्तुतर म्हणून भारतीय लष्कराने देखील ताबडतोब एक्स वरूनच खुलासा करत जवळपास एक कोटी पेक्षा अधिकची रक्कम अक्षयच्या कुटुंबीयांना मिळणार असल्याची माहिती दिली; त्यामुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रामध्ये यावे लागले होते. खरोखरच अक्षयच्या कुटुंबीयांना ही मदत मिळणार का याची खातरजमा करण्यासाठी उद्या २६ ऑक्टोबर रोजी अक्षयच्या रक्षाविसर्जनानिमित्त राहुल गांधी यांचा पीए पिंपळगाव सराई येथे येणार असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सेनादलामध्ये चार वर्षासाठी भरती झालेला जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील अग्नीवीर जवान अक्षय गवते याला सियाचीन ग्लेशियर युद्धभूमीवर दि. २० ऑक्टोबर रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्याच्या पार्थिवावर २३ ऑक्टोबरला पिंपळगाव सराई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. अग्नीवीर जवान अक्षय गवते याच्या मृत्यू संदर्भात निधना संदर्भात केलेल्या पोस्टमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी चौफेर टिकेचे लक्ष बनले होते. भारतीय सेना दलाने खुलासा केल्यानंतर तर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्ष देखील बराच अडचणीत आला होता. त्यामुळे त्यांना बचावात्मक पवित्रा स्वीकारणे भाग पडले होते. मात्र एवढे होऊनही काँग्रेसने नमती भूमिका घेण्याची मात्र तयारी दाखवली नसून अक्षयच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा विशेष दूत म्हणून त्यांच्या खास मर्जीतला बीए उद्या पिंपळगाव सराई येथे दाखल होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
स्थानिक नेत्यांकडून झाल्या होत्या हालचाली
शहिदांच्या बलिदानाचे देखील राजकारण करणाऱ्या काँग्रेसबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र शब्दांमध्ये नापसंती व्यक्त होत असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसला बचावात्मक पवित्रा स्वीकारावा लागला आणि त्यामुळे या यासंबंधीची माहिती स्थानिक नेत्यांकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीद्वारे राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. या माहितीवरून राहुल गांधी यांनी आपला विशेष दूत पाठवला असल्याचे कळत असून उद्या रक्षा विसर्जनाच्या प्रसंगी प्रत्यक्ष काय घडणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागून राहिली आहे.