
Breaking News श्वेताताई फडणवीसांना भेटल्या ; ‘ खामगाव – जालना ‘ साठी ५० टक्के निधी देण्याची केली मागणी
MH 28 News Live, चिखली : आ. श्वेताताई महाले यांनी खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने भरावयाच्या हिश्श्याची तरतूद राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्रज फडणवीस यांच्याकडे आज एका निवेदनाद्वारे केली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वेमार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या भांडवल गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत मान्यता दिल्याने या मार्गाचे सर्वेक्षण सुरू झालेले आहे. याचे वाणिज्यिक सर्वेक्षणही झालेले आहे. खामगाव जालना या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरावा यासाठी ४ मार्च २०२० रोजी आ. श्वेताताई महाले यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून या विषयाला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सभागृहात वाचा फोडली होती. त्या प्रश्नाच्या उत्तरात या रेल्वेमार्गातील अडचणी दूर करून सदर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही तत्कालीन परिवहन मंत्री यांनी दिली होती. त्या अनुषंगाने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी परिवहन मंत्री ना. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली आहे. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी २७ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथे बुलढाणा व जालना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. फायनल लोकेशन सर्वेसाठी चार कोटी रुपयांना मान्यता दिली आहे.
सदर रेल्वे मार्गास सद्यस्थितीत २०१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार त्यांचा हिस्सा भरण्यास तयार असल्याचे समजते (यात आता वाढ होऊ शकते). परंतु सदर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरण्यासाठी अजून सहमती न दर्शविल्याने सदर मार्गाचे काम सुरू झाले नाही अशी माझी माहिती आहे. त्यामुळे सदर रेल्वे मार्गाचा राज्य शासनाने आपला हिस्सा भरण्याबाबत राज्य सरकारने हमी द्यावी तसेच याच सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पात तरतूदही करावी अशी विनंती निवेदनात केली आहे.
रेल्वे लोकआंदोलन समितीच्या मागणीची आ. श्वेताताई महाले यांनी घेतली दखल
परवाच रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी आ. श्वेताताई महाले यांची भेट देऊन त्यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे एक निवेदन सादर केले होते. खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के निधी मंजूर करण्याची मागणी यामध्ये केली होती. या मागणीचा आपण तातडीने पाठपुरावा करू आणि ५० टक्के निधी राज्य शासनाने मंजूर करावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही आ. महाले यांनी दिली होती; आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सादर केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून आ. श्वेताताई महाले यांनी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या मागणीची दखल घेतली असेच म्हणावे लागेल.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button