
कर्जमाफीचे आश्वासन अपूर्ण; थुट्टे दाम्पत्याच्या आत्महत्येवरून रोहित पवारांची सरकारवर टीका
MH 28 News Live / बुलढाणा : राज्यात सत्तेवर येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन फोल ठरल्याचा गंभीर परिणाम राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यावर झाला आहे. या अपूर्ण आश्वासनामुळे थुट्टे दाम्पत्याला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले, असे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
रोहित पवार यांनी काल भरोसा गावात जाऊन आत्महत्याग्रस्त थुट्टे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शेतकरी आत्महत्येचा मुद्दा सरकारपुढे पुन्हा जोरदारपणे मांडला. “जर सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन वेळेवर पूर्ण केले असते, तर थुट्टे दाम्पत्याचे प्राण वाचले असते,” असे रोहित पवार यांनी स्पष्टपणे म्हटले. ते पुढे म्हणाले, “राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, बाजारातील अनिश्चितता आणि कर्जाचा भार सहन करत जगावे लागत आहे. सरकार मात्र सत्तेच्या नशेत आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष केले जात आहे.”

या भेटीदरम्यान रोहित पवारांनी थुट्टे कुटुंबीयांना आवश्यक मदतीचे आश्वासन दिले. तसेच, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. शेतकरी आत्महत्यांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे.



