
पिवळ्या पाण्यामुळे चिखलीकर झाले त्रस्त तर न. प. मात्र सुस्त
MH 28 News Live, चिखली : गेल्या चार दिवसांपासून चिखली शहरात नगरपालिकेद्वारे नळाद्वारे दूषित व पिवळे पाणी सोडले जात आहे. या प्रकारामुळे चिखलीकर नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून यामुळे शहरात साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेल्या चिखली शहरामध्ये नगरपालिकेकडून बारा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही दिवसांपासून या नळाद्वारे दूषित व पिवळे पाणी सोडले जात आहे. शहरातील गांधी नगर, राऊतवाडी, संभाजी नगर आणि जुने गाव परिसरात नळातून येणार्या पिवळ्या पाण्याला दुर्गंधी असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे शहरात साथ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली असून पालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. या संदर्भात नगरपालिकेकडून कुठलाही अधिकृत खुलासा अद्यापपर्यंत न झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात असून नगर पालिका प्रशासन याबाबत नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.



