
पत्नीच्या विरहाचे दु:ख झाले अनावर ; पतीने तेरवीच्या दिवशी संपवले जीवन… मेहूणा राजा गावतील ह्रदयद्रावक घटना
MH 28 News Live / देऊळगाव राजा : पत्नीच्या निधनाचा आघात मनाला इतका खोलवर भिडला की, अखेर ७२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने स्वतःचे जीवन संपवल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तुकाराम महादू कदम असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पत्नी कचराबाई कदम यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. आयुष्यभर सुख-दुःखात साथ देणाऱ्या जीवनसाथीच्या जाण्याने तुकाराम कदम पूर्णपणे खचून गेले होते.

गावकऱ्यांच्या माहितीनुसार, तुकाराम आणि कचराबाई कदम यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. अनेक दशकांचा संसार, एकमेकांवरील विश्वास आणि वृद्धापकाळातील आधार अचानक तुटल्याने तुकाराम कदम यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. पत्नीच्या निधनानंतर ते सतत दुःखी राहत होते. घरातील वातावरणही शोकमग्न झाले होते. पत्नीच्या आठवणींनी ते पूर्णपणे व्याकुळ झाले असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पत्नीच्या तेराव्याच्या कार्यक्रमाची तयारी घरात सुरू असतानाच ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास तुकाराम कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अल्पावधीतच आई-वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. “पत्नी गेल्यापासून ते पूर्णपणे एकटे पडले होते,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. तुकाराम कदम हे गावातील शांत, मनमिळावू आणि कष्टाळू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. आयुष्यभर शेती करत संसार उभा करणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याचा असा दुःखद अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.



