
सणांमधील मांसविक्रीबाबत जितेंद्र आव्हाड बोलले की…
MH 28 News Live : सध्या मांसाहार करणे देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. नवरात्रीनिमित्त स्थानिक प्रशासनाने मांसविक्रीवर बंदी घतल्याच्या प्रकारानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. चैत्र महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्रीत मांस विक्रीवर बंदीचा निर्णय दिल्लीत घेण्यात आला होता, बंदीनंतर लोक मांस खाणार नाहीत असे सांगण्यात आले होते.
दरम्यान या मांस विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली आहे, आव्हाड यांनी ट्विट करत नवरात्रीच नाही तर कोणत्याही सणांच्या काळात मांसविक्रिवर बंदी नको असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत “नवरात्रीमध्ये नाहीतर कुठल्याही सणाच्या दिवसांमध्ये मांसाहारावर बंदी नको.” असे म्हटले आहे. इतकेच नाही तर, त्यांनी “भारतीय खाद्य संस्कृतीचा सन्मान करा, ८० % भारतीय जनता मांसाहारी आहे.” असे आवाहन देखील केले आहे.
माहाराष्ट्रीतील महत्वाचे तीर्थक्षेत्र संत तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहूमध्ये काही दिवसांपुर्वी मांस आणि मासे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मासे किंवा मांस विकणाऱ्यास पहिल्या वेळी ५००० रुपये आणि दुसऱ्यांदा २५, ००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
तर दक्षिण दिल्ली महापालिकेचे महापौर मुकेश सुर्यन यांनी देखील दक्षिण दिल्लीत नवरात्री दरम्यान मांसविक्रीला बंदी घातली. अनेक नागरीकांच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इतकेच नाही तर काही इस्लामिक देशांमध्ये रमजान महिन्यात सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यावर निर्बंध असते. हेही तसंच असल्याचं महापौर मुकेश यांनी सांगीतलं होतं.
तर सरकारचे सर्व कार्यक्रम व बैठकांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पेटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीय. सरकारी कार्यक्रमांमध्ये मांसाहारी पदार्थांवर पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय जर्मनीच्या पर्यावरण मंत्रालयाने नुकताच घेतला. या पार्श्वभूमीवर, भारतानेही अशाच स्वरुपाचा निर्णय घ्यावा, असे आवाहन पेटाने पंतप्रधानांना केले होते.



