♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत असलेल्या जवानांसाठी 15 जुन 2022 पर्यंत राबविण्यात येणार अमृत जवान अभियान

MH 28 News Live, बुलडाणा : माजी सैनिक, त्यांचे कुटूंबिय आणि हुतात्मा जवानाच्या कुटूंबियांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी 15 जुन 2022 पर्यंत अमृत जवान अभियान 2022 राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश पारीत करून अमृत जवान अभियान 2022 राबविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. जवानांच्या समस्या अभियानामुळे मार्गी लागणार आहे. सैन्य कालावधीत देशाच्या सीमेवर सेवा करताना जवानांना गावाकडील वैयक्तिक आणि कौटुंबिक कामाकडे लक्ष देता येत नाही. परिणामी, कामे प्रलंबित राहतात. सैनिकाची सेवा आणि देशासाठीचे समर्पण लक्षात घेवून जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी अमृत जवान अभियान 15 जुन 2022 पर्यंत राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या अभियानात महसूल विभागाकडील प्रलंबित फेरफार, बिनशेती व बांधकाम परवानगी, भुसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, पोलीस विभागाकडे विविध तक्रारी / समस्या समाज कंटाकांडून त्रास होत असल्याबाबत तक्रारी, जमीन / जमिनीच्या हद्दी, पाणी यावरून होणारे फौजदारी स्वरूपाचे वाद ग्रामविकास विभागाकडील विविध योजनांचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावरील रहिवास विषयक विविध बाबी, कृषि विभागाकडील विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाकडील परवाने तसेच अन्य विभागांकडील अशा कामांसाठी विशेष मेळावे घेवून माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न विशेष प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील. या अभियानात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात अमृत जवान सन्मान दिन आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभागप्रमुख व सैनिक अर्जदार यांच्या उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत त्यांच्या प्रश्नांच्या निरसनासाठी विशेष मेळावेही घेण्यात येतील. अभियानासाठी तालुका व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्यामध्ये तालुका व जिल्हा स्तरावर सर्व खातेप्रमुख, सैनिक संघटना प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

हे अभियान राबविण्याकरीता एक जबाबदार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात येत आहे. कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. या कक्षात दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी तालुका व जिल्हा स्तरावर विविध प्रकारच्या समस्येचे निरसन करण्यासाठी अमृत जवान अभियान 2022 अंतर्गत लाभ घ्यावा, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129