
किसान सन्मान निधीसाठी बँक खाते. आधार क्रमांकाशी जोडण्याचे आवाहन. पोस्टातही आधार क्रमांक जोडण्याची सुविधा
MH 28 News Live, बुलडाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला २ हजार रूपये प्रति हप्ता याप्रमाणे ६ हजार रूपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेतील १३ वा हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. केंद्र शासनाने १३ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचा लाभ ज्या बँक खात्यात जमा करावयाचा आहे ते बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे. यासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात सद्यस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात १३ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडल्या जाईल. सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध करण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्टमास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करतील. योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत दि. १ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत राज्यात मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.