
युवाशक्ती करिअर शिबीर आशेचा किरण ठरेल – आ. श्वेताताई महाले अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनाला लाभला युवकांचा प्रतिसाद
MH 28 News Live, चिखली : देशातील बेरोजगारीवर उपाय म्हणून स्वयंरोजगार व कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान होत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारतामध्ये कौशल्य विकासाला चालना मिळाली, पंतप्रधानांच्या संकल्पनेला तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कौशल्य विकास मंत्रालयातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक व सुशिक्षित बेरोजगारांसाठी आशेचा किरण ठरेल असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली. दि. १२ मे रोजी आयोजित या शिबीराचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे राज्यभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अश्या शिबीरांचे आयोजन केले जात आहे. याद्वारे सुशिक्षित बेरोजगार युवक तसेच इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना आपल्या करिअरसंभंधी अचूक व सविस्तर मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते. स्थानिक श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या शिबीराचे उद्घाटन आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते तसेच विधान परिषद पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह डॉ. आनंद पाटील (संचालक स्टडी सर्कल, मुंबई ), विशाल नरवाडे (I.A.S.), समीर वानखेडे (I.R.S.) व डॉ. सतिष तांबट ( Phd), सिध्दार्थ भंडारे ( उपजिल्हाधिकारी, पुणे ) या अनुभवी तज्ञांनी मार्गदर्शन केले.
युवा नव उद्योजकांसाठी लवकरच विकास परिषदेचे आयोजन करणार – आ. श्वेताताई महाले
विविध कंपन्यांमध्ये नोकर भरतीच्या वेळेला घेण्यात येणाऱ्या मुलाखतीमध्ये इंग्रजी भाषेचे वापर जास्त होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये या भाषेबद्दल असलेल्या न्यूनगंड ही एक मोठी कच्ची बाजू असून हा न्यूनगंड दूर करण्याची गरज असल्याचे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या. प्रचलित शिक्षणाबरोबर व्यवसायभिमुख शिक्षण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे; याचे महत्त्व ओळखून औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या माध्यमातून रोजगार व्यवसाय भूमिक शिक्षण देण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीने केले जात असून चिखली येथील आयटीआय महाविद्यालयामध्ये देखील विविध प्रकारचे ट्रेड उपलब्ध आहेत, त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. स्थानिक युवकांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी चिखली एमआयडीसीमध्ये लवकरच एक युवा नवउद्योजकांसाठी विकास परिषद भरवण्यात येणार असल्याची माहिती देखील आ. महाले यांनी यावेळी दिली.
अभ्यास आणि प्रयत्नातून यश मिळेल – समीर वानखेडे
स्पर्धा परीक्षा तसेच मोठमोठ्या पदावरील नोकऱ्यांसाठी फक्त इंग्रजी भाषाच अनिवार्य आहे हा गैरसमज विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकावा; आपल्या मातृभाषेमध्ये देखील ते परीक्षा व मुलाखती देऊ शकतात यामुळे आत्मविश्वासाने तयारी करावी असे प्रतिपादन समीर वानखेडे यांनी केले. यूपीएससीच्या परीक्षा अतिशय पारदर्शकपणे घेतल्या जातात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लग्गा – वशिला चालत नाही ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संपूर्ण सखोल अभ्यासाबरोबरच सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळेल असे देखील वानखेडे म्हणाले.
*पालकांची भूमिकाही महत्त्वाची – डॉ. आनंद पाटील*
पहिल्याच प्रयत्नात आपण यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही अशी भीती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असते; त्यामुळे बरेच विद्यार्थी या परीक्षांपासून दूर राहतात मात्र, अशी कोणत्याही प्रकारची भीती मनात न बाळगता विद्यार्थ्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करावे असे मार्गदर्शन आनंद डॉ. पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांच्या पालकांचा देखील मोठा सहभाग असतो; आपला पाल्य योग्य दिशेने जात आहे की नाही यावर पालकांनी बारीक लक्ष ठेवावे, त्याला सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य करावे त्यामुळे आपल्या कुटुंबाचे, समाजाचे व देशाचे नशीब बदलायला आपला देखील हातभार लागेल असे आवाहन डॉ. आनंद पाटील यांनी यावेळी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगत आतून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या याशिवाय विशाल नरवाडे (I.A.S.), समीर वानखेडे (I.R.S.) व डॉ. सतिष तांबट, सिध्दार्थ भंडारे ( उपजिल्हाधिकारी, पुणे ) यांची देखील या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणे झाली. आ. धीरज लिंगाडे व माजी आमदार विजयराज शिंदे यांची देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे यांनी केले. यावेळी मंचावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष सुधीर तांबट, प्राचार्य एस डी गंगावणे, भाजप तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, संतोष काळे, सुभाषआप्पा झगडे, सागर पुरोहित, गोविंद देव्हडे, विजय गवई, तेजराव नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. चिखली शहर व तालुक्यातील एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सुशिक्षित बेरोजगार युवक युतीची मोठी उपस्थिती या शिबिराला लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गणेश कर यांनी केले तर प्राचार्य गंगावणे यांनी आभार मानले. शिबीरस्थळी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती, करिअर प्रदर्शनी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांचे स्टाँल्स लावण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला



