
एमआयडीसी विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण तात्काळ थांबवा – आ. श्वेताताई महाले यांचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश भानखेड भालगाव व बेराळ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
चिखली : राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत चिखली औद्योगिक क्षेत्राच्या ( एमआयडीसी ) विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत तालुक्यातील भानखेड, भालगाव व बेराळा या तीन गावातील शेत जमीन अधिग्रहित करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांची माहिती जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना शासनाकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देखील तलाठ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र या तीनही गावातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांनी या नियोजित विस्तारीकरणाला विरोध केला व आ. श्वेताताई महाले यांचे भेट घेऊन आपल्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. शेतकऱ्यांचे ही शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आ. महाले यांनी ताबडतोब तहसीलदारांना पत्र पाठवून व जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क करून भालगाव, भानखेड व बेराळा या तीनही गावातील भूसंपादनाची प्रक्रिया व सातबाराची माहिती संकलित करण्याचे काम त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले असून त्यामुळे या तीनही गावातील शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चिखली एमआयडीसीमध्ये उद्योग व्यवसायांना जागा कमी पडत असल्यामुळे या एमआयडीसीचे क्षेत्र वाढवण्याची मागणी उद्योजकांकडून शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अमरावती यांच्याकडून चिखली तहसील कार्यालयाला स्थानिक औद्योगिक विकास केंद्र ( एमआयडीसी ) च्या विस्तारीकरणासाठी भालगाव, भानखेड व बेराळा या चिखली शहरालगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या उद्देशाने सदर शेतजमिनींच्या सातबारांची माहिती जमा करण्याचे निर्देश एका पत्राद्वारे देण्यात आले होते. या निर्देशानुसार चिखलीच्या तहसीलदारांनी तीनही गावातील तलाठ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या सूचनेनुसार तलाठ्यांकडून भालगाव, भानखेड व बेराळा गावातील शेतकऱ्यांच्या सातबाराची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले होते. या तीनही गावातील बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक असून त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच असल्यामुळे आपली शेतजमीन एमआयडीसीच्या विस्तारीकरणात जाणार असल्याचे कळताच शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला व भविष्यात आपल्याला उत्पन्नाचे कुठलेही कायमस्वरूपी साधन राहणार नसल्याची भावना त्यांच्या मनात घर करू लागली. या भावनेतून सदर विस्तारीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला. शेतकरी बांधवांच्या या प्रतिक्रिया कळताच आ. श्वेताताई महाले यांनी तातडीने या तिन्ही गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या व त्यांच्याशी या संदर्भात साधक वादक चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते.
विस्तारीकरण व भूसंपादन थांबवा – आ. श्वेताताई महाले यांचे निर्देश
भालगाव, भानखेड व बेराळा येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची सामूहिक भावना आ. श्वेताताई महाले यांनी समजून घेतली व या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता त्यांनी दि. ५ फेब्रुवारी रोजी चिखलीच्या तहसीलदारांना पत्र लिहिले व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी सुद्धा या संदर्भात संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली. तहसीलदारांना दिलेल्या पत्रात पत्रात आ. महाले यांनी भालगाव वानखेड व बेराळा येथील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांच्या शेतजमिनी एमआयडीसीच्या विस्तारीकरणात गेल्यास त्यांच्यापुढे उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे ही बाब लक्षात घेता सदर विस्तारीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबवण्याचे व सातबाराचे माहिती संकलन देखील बंद करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. या संदर्भात काय कार्यवाही केली याबाबत आपल्याला कळवावे असे आ. श्वेताताई महाले यांनी तहसीलदारांना लिहिलेल्या या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. जिल्हाधिकारी पाटील यांच्याशी देखील आ. श्वेताताई महाले याच प्रकारे बोलल्या असून भालगाव, भानखेड व बेराळा येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची खबरदारी आ. महाले यांनी घेतल्याचे यातून स्पष्ट होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button