
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीला सूचना द्याव्यात
- MH 28 News Live, बुलडाणा : हवामानशास्त्र विभागाचे अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातही काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा घटनांमुळे रब्बी हंगामातील विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा या पिकांचे नुकसान होण्याची
शक्यता आहे.
याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत त्यांच्या विमा संरक्षित पिकांचे नुकसान झालेले असल्यास नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असून, याबाबतची सूचना (intimation) आपल्या संबंधित विमा कंपनी यांना देण्यात यावी.
या पर्यायांचा करा वापर
क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance App), विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुका स्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा त्यामुळे नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची सूचना (intimation) नुकसान झालेल्या पिकाच्या फोटोसह आपल्या संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावी असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त असून कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18001024088 आहे व ईमेल आयडी rgicl.pmfby@ relianceada.com आहे.



