
बिबट्या आला रे आला sss कवठळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; गावात दहशतीचे वातावरण
MH 28 News Live / चिखली : कवठळ परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात प्रतुल रामेश्वर गावंडे यांच्या मालकीची शेळी ठार झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वतीने प्रदीप प्रकाश मुंढे (वनपाल, बुलढाणा) तसेच जि. एम. पोटे (वनरक्षक, अंचरवाडी बिट) यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेळीचा पंचनामा केला.
विशेष म्हणजे, सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात शिवाजी घुबे यांच्या दोन बकऱ्याही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या. त्यामुळे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून गावातील नागरिक व पशुधनाचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पंचनामा करताना गणेश वाघमारे, पंढरीनाथ गावंडे, सतीश गावंडे, श्रीराम गावंडे, शालिग्राम कह्राडे आणि ज्ञानेश्वर राऊत यांची उपस्थिती होती.
बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



