
काँग्रेसने काढले ” वड्याचे तेल वांग्यावर ” पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना हटवले
MH 28 News Live : नुकत्याच घोषित झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला. या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्वाबद्दल नाराजी मोठ्या प्रमाणावर आणि जाहीरपणे नाराजी व्यक्त होऊ लागली. पाच राज्यातील निवडणूक निकालांवर विचार करणारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दोन दिवसांपूर्वीच नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळणार काय ? गांधी – नेहरू कुटुंबातील व्यक्ती अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार काय ? असे प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु, ते सर्व फोल असल्याचे बैठकीअंती स्पष्ट झाले. उलट या बैठकीनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या पाचही राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांना हटवले असून त्यांच्या जागेवर येणाऱ्या काळात नवीन प्रदेशाध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. केंद्रीय नेतृत्व बदलण्याऐवजी प्रदेशाध्यक्षांना काढण्याची काँग्रेस पक्षाने केलेली ही कारवाई म्हणजे एक प्रकारे वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार होय अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.
काँग्रेसने आज घेतलेल्या निर्णयामुळे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे. मागील काही वर्षांपासून पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही निवडणुकांच्या प्रचारामध्ये आपला सहभाग नोंदवला नाही. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दोघेच स्टार प्रचारक राहिले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रभारी सचिव प्रियंका गांधी यांनी प्रचार करून देखील काँग्रेसच्या राज्यातील ४०३ जागांपैकी केवळ २ जागाच वाट्याला आहेत. संपूर्ण मतदानातील टक्केवारी कमी होऊन ती २.३३ टक्क्यांवर आलेली आहे. काही उमेदवारांची डिपॉझिटही जप्त झालेली आहेत.
२०१९ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सामान्य निवडणुकांमध्येही सलग दोन वेळी काॅंग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. शेवटी हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींनी पक्षाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी २०२० मध्ये पक्षातील काही नेत्यांनी ‘G-23’ द्वारे बंडखोरी केल्यामुळे पदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. पण, CWC ने पदावर राहण्याचा हट्ट केला. पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या जबरदस्त पराभवामुळे ‘G-23’मधील नेत्यांनी शुक्रवारी भविष्यातील रणनितीची चर्चा केली. ही बैठक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झाली. त्यामध्ये कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि मनीश तिवारी देखील सहभागी होती. एकूणच ” वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून उमटत आहेत.



