
वीज चोरी पकडली, ४३ लाखाचा दंड केला मात्र गुन्हा दाखल करायला तेरावा दिवस उजाडला; महावितरणच्या कार्यक्षमतेवर उभे राहिले संशयाचे प्रश्नचिन्ह
MH 28 News Live : : चिखली एमआयडीसी मधील अग्रवाल बंधू यांचे एम/एस. एशियन पाईप्स अँड सिमेंट काँक्रीट वर्क व श्री बालाजी कृषी उत्पन्न बाजार समिती व ऍग्रो इंडस्ट्रीज चिखली येथे महावितरण च्या बुलढाणा येथील भरारी पथकाने दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी छापा टाकून तपासणी केली असता दोन्ही ठिकाण चे मिळून एकूण ५१ लाख २३ हजार ९२० रुपयांची विद्दुत चोरी उघडकीस आली. यावरून दिनांक ०८ जानेवारी २०२५ रोजी पवन सुरेश अग्रवाल व मनीष सुरेश अग्रवाल या दोघांविरुद्ध अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत उत्तमराव कलोरे यांनी बुलढाणा पोलिसांकडे रीतसर तक्रार दिल्याने दोन्ही अग्रवाल बंधू यांच्याविरुद्ध भारतीय विद्दुत अधिनियम (सुधारणा) २००३ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेमध्ये महावितरणने गुन्हा दाखल करण्यास विलंब का लावला या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे
याबाबत प्राप्त माहितीनुसार, दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत उत्तमराव कलोरे व त्यांचे सहकारी आशिष सुनील देशमुख, सहा. सुवअं, समाधान रामदास गायकवाड, तंत्रज्ञ, गजानन श्रीराम पाटील, तंत्रज्ञ, यांनी चिखली एमआयडीसीमध्ये असलेल्या पवन सुरेश अग्रवाल व मनीष सुरेश अग्रवाल यांच्या श्री बालाजी कृषी उत्पन्न बाजार समिती व ऍग्रो इंडस्ट्रीज चिखली व एशियन पाईप्स अँड काँक्रीट वर्क चिखली येथे मिटर तपासणीसाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की, दोन्ही ठिकाणच्या मीटरच्या विविध फेजवर करंट सुरू होता. तरीसुद्धा मिटर डिस्प्ले व पल्स बंद होते. तसेच मीटरच्या टीसी पोर्टला कुठेही सील आढळून आले नाही. त्यामुळे ग्राहकासमक्ष मीटरच्या पिटीचे आर, वाय, बी व एन चे स्क्रू ढिले दिसत असल्याने ते कसल्यावर मीटरचा डिस्प्ले व पल्स सुरू झाला. म्हणजे वापरकर्त्यांनी मिटर बायपास केलेले आढळले. वापरकर्त्यांनी मिटरशी ही छेडछाड अप्रामाणिकपणे वीजचोरीच्या उद्देशाने केलेली असल्यामुळे विद्दुत कायदा २००३ सुधारित २००७ कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. सदर तपासणीचा स्थळ निरीक्षण अहवाल (एस.आर. नं.) ३ पीएच २४२२८ व २४२२९ दि. २६/१२/२०२४ मध्ये जोडभार १४९.५ केडब्ल्यू व १३२.१९२ केडब्ल्यू, जोडभारासाहित नोंदविण्यात आला असून घटनास्थळी पंचनामा व जप्ती पंचनामा करून सील लावण्यात आले.
या दोन्ही ठिकाणी वरील वीजचोरीपोटी मागील ८ महिन्यांपासून विद्दुत वितरण कंपनीच्या १,३७,८४० युनिटची २४ लाख ९९ हजार ०८० रुपये व १,४१,५९० युनिटची रुपये २६ लाख २४ हजार ८४० असे एकूण ५१ लाख २३ हजार ९२० रुपयांची वीज चोरी झाली. तर तडजोडी अंती दोन्ही प्रकरणाचे मिळून एकूण ४३ लाख रुपये विजवापरकर्त्याने वेळ देऊनही जमा न केल्याने दि. ८ जानेवारी २०२५ रोजी अप क्र. २५/२०२४ व अप क्र. २६/२०२४, भारतीय विद्दुत अधिनियम (सुधारणा) २००३ चे कलम १३५ नुसार पवन सुरेश अग्रवाल व मनीष सुरेश अग्रवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, बीज चोरीची घटना १३ दिवसांपूर्वी उघडकीस येऊन देखील गुन्हे दाखल होण्यास विलंब लागल्याने महावितरणच्या कारभारावर संशयाचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button