
शिक्षक भरतीची लांबलेली परीक्षा होणार आता एप्रिलमध्ये
MH 28 News Live : चार वर्षांपूर्वी पवित्र पोर्टलवरून सुरू झालेली शिक्षक भर्तीची प्रक्रिया अर्धवट असतानाच, आता दुसरी अभियोग्यता परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याची सूचना उमेदवारांना पवित्र पोर्टलवरच देण्यात आली आहे.
राज्यात २०१२ पासून शिक्षक भर्तीवर बंदी होती. २०१७ मध्ये ती उठविण्यात आली व डिसेंबरमध्ये पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यात पावणेदोन लाख बी. एड., डी. एड. धारकांनी आपली पात्रता सिद्ध केली. मात्र, तब्बल दोन वर्षे भरती करण्यात आली नाही.
नंतर २०१९ मध्ये मुलाखतींशिवाय नेमावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील साडेतीन हजार पदे भरण्यात आली. मात्र, मुलाखतीसह खासगी संस्थांच्या शाळांमधील भरावयाच्या जागा अद्यापही भरण्यात आलेल्या नाहीत. आता शिक्षक भर्तीसाठी २०१७ नंतर थेट २०२२ च्या एप्रिलमध्ये परीक्षा होणार आहे. यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारीतच अभियोग्यता परीक्षा घेण्याबाबत शिक्षण आयुक्तांना सूचना केली होती. मात्र, टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे फेब्रुवारीचा मुहूर्त टळला.
वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी
अनेक दिवसांपासून भरतीप्रक्रिया सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे भरतीप्रक्रिया रखडत चालली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. तसेच, नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रकही तातडीने जाहीर करावे, अशी मागणी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनने केली आहे.
खासगी संस्थांची कुचराई कायम
खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मुलाखतीसह शिक्षकांची निवड करण्याची प्रक्रिया मध्यंतरी पवित्र पोर्टलद्वारे सुरू करण्यात आली होती. त्यासाठी २ सप्टेंबर २०२१ ला शिफारसपात्र उमेदवारांची नावे संस्थांना कळविली गेली. मात्र, आजपर्यंत राज्यातील केवळ ३६२ संस्थांनी ७८९ उमेदवारांची निवड केल्याची नोंद पोर्टलवर केली आहे. प्रत्यक्षात शेकडो संस्थांमधील हजारो पदे रिक्त असून, त्या सर्वांना शिफारसपात्र उमेदवारांची नावे कळविली गेली होती.