
नवरात्रीत लाखो भाविकांचे ‘अनवाणी व्रत’ पादत्राणांना नऊ दिवस मिळतेय अल्पशी विश्रांती
MH 28 News Live : चिखली : लक्षावधी श्रध्दाळूंमध्ये नवरात्रोत्सवाशी संबधित एक अनोखी आणि अलिखित परंपरा आहे,ती म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात घटस्थापना पासूनच बुलढाणा नगरीतील हजारो भाविक अनवाणी दिसतात. नवमी पर्यंत हे चित्र कायम राहते. यामध्ये ‘भरकटलेली किंवा बिघडलेली पिढी’ असा उल्लेख होणाऱ्या तरुणाईचे यात ६० टक्के प्रमाण आहे.
अंगावर भारी किंमतीची जीन्स, टी शर्ट किंवा आधुनिक फॅशन चा शर्ट, जाकीट, डोळ्यावर गॉगल, केसांचे वेगवेगळे ‘डिझाईन’ , असा जबर थाट पण पायात महागडा बूटच काय स्लीपर देखील नाही. युवतींचा ही असाच ‘लुक’ असतो. भारी महागडे कपडे पण पाय मात्र अनवाणी, यात महिलांचे प्रमाणही मोठे आहे. अंगावर अगदी जॉर्जेट, पैठणी, ‘स्लीवलेस’ असलेली महि
लाही बिना पादत्राणे असेच चित्र. नवरात्रोत्सव मध्ये देवीवरील श्रद्धा पोटी हे अनवाणी व्रत पाळले जाते.
बुलढाण्यात तसेच चिखली शहरात ही अलिखित परंपरा कधी सुरू झाली हे नक्की सांगता येणार नाही. मात्र किमान २५ वर्षांपासून नवरात्रीत अनवाणी व्रत पाळले जात आहे. चिखली शहराचे ग्राम दैव असलेल्या श्री रेणुका देवीवरील श्रध्देपोटी अनेक भाविक ९ दिवस अनवाणी फिरतात. जग झपाट्याने बदलत आहे, फॅशन ओंगळवणी झाली पण हे व्रत पाळणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. यंदा किमान २५ हजार बुलढाणेकर याचे पालन करीत असल्याचा अंदाज आहे. याविषयी विचारणा केल्यावर बहुतेक ‘साधक’बोलण्याचे टाळतात. काही जण ‘मातेवरील श्रद्धेपोटी करतोय’, असे एका वाक्यात उत्तर देतात तर काही जण याला आरोग्य विज्ञानाची जोड देतात.



